डॉ. बाबासाहेबांचे संविधान व आजची परिस्थिती….dr. babasaheb ambedkar
अहो त्या अंधारावरती राज्य करणाऱ्या चंद्राच्याही डोळ्यात खुपतो आम्ही कारण उशाला विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन झोपतो आम्ही. नमस्कार आज आपल्या समोर विषय मांडतोय डॉ. बाबासाहेबांचे संविधान व आजची परिस्थिती. दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ज्या माणसाने अहोरात्र कष्ट घेऊन हे सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान लिहिले. अशा महामानवास मी सर्वप्रथम वंदन करतो.
अहो कोणी जात कोणी धर्म तर कोणी रंग घेतलेत वाटून, तुम्हीच ओ तुम्हीच तुमच्या हातांनी त्या संविधानाचे आज पंख टाकलेत छाटून. ज्या भारत देशात आपला जन्म झाला त्या भारत देशाच संविधान संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ अस संविधान ओळखलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला बहुमोल असा वेळ देऊन या भारतीय संविधानाची निर्मिती केली.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
संविधानाच्या माध्यमातून आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा सर्वोत्तम हक्क आणि अधिकार मिळवून दिला. त्या महामानवाचे आपल्या संपूर्ण भारतीयांवर कोटी कोटी उपकार आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र दिला. संविधान म्हणजे प्रत्येक भारतीयांचा प्राण आहे संविधान म्हणजे आपल्या भारत देशाची शान आहे. तिरंग्याचा अभिमान आहे. प्रत्येक भारतीयांच्या विचारांचा स्वाभिमान आहे. अहो एवढंच काय संविधानातील प्रत्येक कलम म्हणजे भारतीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरील सर्वोत्कृष्ट असा मलम आहे.
अहो सत्तेसाठी हापलेली कुत्री इथे पावलापावलावरती भेटतात, गीता कुराण बायबल ची शपथ घेऊन संविधानाला जाळतात. संविधानातील प्रत्येक कलमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जीव ओतलाय, म्हणून तर तो तिरंगा अशोक चक्रासोबत फडकलाय.
संविधान वाचणारा कुठेच अडत नाही, संविधान वाचणारा कुठेच नडत नाही. आणि संविधान जपणारा कुठेच सडत नाही. ही ताकत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची. तुमच्या मनातील समतेची आणि तिरंग्यावरच्या अशोक चक्राची. अहो अन्याय अत्याचारावर आवाज उठवायला शिकवणार आहे डॉ. बाबासाहेबांचं संविधान, आपले मत मांडण्याचा अधिकार देणार आहे आपलं भारतीय संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची इथल्या प्रत्येक काळजात धगधगती मशाल पेटवणार आहे आपलं भारतीय संविधान.
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार आहे डॉ. बाबासाहेबांचे संविधान. थंड पडलेल्या रक्ताला गरम करून लढण्यास बळ देणार आहे डॉ. बाबासाहेबांचे संविधान. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देऊन राजासारखं जगायला शिकवणार आहे डॉ. बाबासाहेबांचे संविधान. इथल्या प्रत्येक काळजात मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पेरिन, संविधान वाचुन नवा इतिहास रचीन. अस ठणकावून सांगणार आहे डॉ. बाबासाहेबांचे संविधान.
लोकशाहीला आणि संविधानाला तराजूत एखाद्या भाजीपाल्यासारखं मोजल जातंय, अरे रक्ताला कोणती जात धर्म नसतो रे हेच ते संविधान तुम्हाला ओरडून सांगतंय. समोर बसलेल्या प्रत्येकाकडे मी आज हात जोडून भीक मागतोय, बघा बघा तो तिरंगा सुद्धा आज ढसाढसा रडतोय. संविधानाच रक्षण करा याचीच तर मी तुमच्याकडे भीक मागतोय.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, याला भीक तरी नक्की कशाची द्यावी, अहो तुम्हाला भीक द्यायचीच असेल तर भारतीय संविधानाची द्या. त्या तिरंग्यावरील अशोक चक्राच विचार आणि संविधान शेवटपर्यंत तुमच्या काळजात कोरून राहुद्या.
आजतागायत आपण पाहतोय की कशाप्रकारे आपल्या या भारत देशात जातीच धर्माच विष कालवून संविधानाच्या नियमांचा भंग केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहीत असताना सर्व भारतीयांचा विचार करून लिहिलेलं संविधान पण आज मात्र त्याच ही उल्लंघन होत असताना दिसून येत आहे.
राजकीय वातावरण आणि बऱ्याच गोष्टी याला जबाबदार आहेत. पण लक्षात ठेवा संविधान आहे त्यामुळे तुम्ही आम्ही आहोत नाहीतर जगणं ही मुश्किल होईल. संविधान टिकलं पाहिजे तरच आपली लोकशाही टिकेल नाहीतर या देशाची आजची परिस्थिती आपल्या सर्वांना एक दिवस विकेल. आजची आपण आपल्या भारत देशातील परिस्थिती पाहतोय की, कशाप्रकारे जाती धर्माच विष कालवून देश विकला जात आहे.
याला जबाबदार फक्त तुम्ही आम्ही आहोत लक्षात असुद्या. जो देश सविधानावर चालतो त्याच देशात संविधानाचा जागर करावा लागतो अहो हेच तर तुम्हाला कळत नाही हीच तर खरी मोठी शोकांतिका आहे. या देशातील प्रत्येक तरुणांनी संविधान वाचलं पाहिजे , संविधानाच रक्षण केले पाहिजे, संविधान इथल्या मातीमध्ये रुजवल पाहिजे, संविधानाचा जागर केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं संविधान टिकेल आणि आपला देश खऱ्या अर्थाने संविधानिक राहील.
अहो वाटून घेतलत त्या तिरंग्यातील तीन ही तुम्ही रंगाना, संविधानाला बाजूला ठेवून खुशाल पूजत बसलात की रे आपआपल्या धर्मग्रंथाना. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला समान न्याय हक्क आणि अधिकार मिळवून दिले. पण आजची परिस्थिती यालाही कुठेतरी गालबोट लावताना दिसून येत आहे.
सविधानावर चालणारा हा माझा भारत देश जर हुकूमशाही कडे वाटचाल करणार असेल तर लोकशाहीला ला आणि संविधानाला काडीची ही किंमत राहणार नाही आणि तुम्हाला आम्हाला गुलाम म्हणून जीवन जगल्याशिवाय पर्याय उरणार नाही. लक्षात राहुद्या हे मी नाही तर माझ्या आतील संविधान बोलतंय…! कळली ना व्यथा तुला माझ्या आतील संविधानाची, चल किती गोळ्या आहेत तुझ्या बंदुकीत कर छाननी माझ्या आतील तिरंग्याची.
आज आपण आपल्या देशातील आजची परिस्थिती बघतोय की ,प्रत्येकजण आपल्या आवडी निवडी सवडी नुसार गरजेनुसार आपआपल्या स्वार्थापोटी संविधानाला विकतोय. अहो संविधाना पेक्षा काहीही मोठं नसत हेच तर तुम्हाला कळत नाही. अहो हीच तर खरी मोठी शोकांतिका आहे. भीमजयंतीला भारताच भविष्य असणार पोरग गाण्याच्या तालावर नाचतय, सांगा आपआपल्या छातीवर हात ठेवून कोणकोण इथे संविधान वाचतय. आम्ही भारताचे लोक इथून सुरू होणारा प्रवास अर्पण करीत आहोत इथे येऊन संपतो.
सोशीलमीडिया वर गुरफुटलेली ही दुनिया डॉ. बाबासाहेबाना कधी वाचणार संविधान कधी वाचणार आणि कधी आजच्या परिस्तिथीवर मात करणार. खूप भयानक वास्तव आहे हे जर देशात कायम हीच परिस्थिती राहिली तर संविधान धोक्यात आहे. वेळीच जाग होण्याची गरज आहे. संविधान वाचून संविधानाला वाचवण्याची गरज आहे.
ज्यांनी संविधान वाचले संविधान प्रमाणे वागले ते आज वेगळं जीवन जगत आहेत. आणि जे बाकी गोष्टीत रमले ते आज वेगळ जिवन जगत असताना दिसुन येत आहेत. हे कुठेतरी चित्र बदलायला हवं. अस मला प्रामाणिकपणे वाटत. अहो लाज वाटतेय मला तुम्हाला भारतीय म्हणायची, घ्या शपथ तिरंग्याची आणि सुरवात करा संविधान वाचायची.
नाव-महेश बजरंग कोळेकर
गाव- काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क-9146133047
मित्रांनो, ताज्या अपडेट, सरकारी योजना, देशातील चालू परिस्थिती, ट्रेंडिंग, कृषी, सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या http://www.abcmarathinews.com ह्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. किंवा व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉइन होऊ शकता.